Tuesday, April 25, 2023

बदलत्या वाचनसंस्कृतीकडे पाहतांना

       📚बदलत्या वाचनसंस्कृतीकडे पाहतांना📚


आधुनिक जगाच्या आधुनिक युगात व स्वातंञ्यापुर्वीच्या पारतंञ्यात परिस्थिती बदलाचे वारे वाहिले ते विचाराच्या युध्दनौकेनी‌. एका शस्ञाच्या हल्ल्यात घातपात होऊन परिस्थिती चिघळते. माञ एक विचार पेरला त्यामुळे त्या विचारांच्या श्रृंखलेतून पारतंञ्यातला देश, स्वातंञ्याच्या उंबरठ्यावरुन आज आधुनिक युगात नांदतो आहे. ही जादू विचारांची, विचारसरणीची! याच विचारांचे युध्द लढायचे असेल तर पुस्तक हेच सर्वोत्तम शस्ञ ठरले आहे. 

 वाचन हे मानवी प्रकृतीला आतून बाहेरुन बदलण्याची ताकद बाळगते. हे सांकेतिक शस्ञ अनेक अंगांनी माणसाच्या आयुष्यात षडरसांची बाग खुलवते. कधी प्रेमाच्या डोहात गुलाबी हवेची झुळूक देते, कधी मायेच्या ओलाव्याने मनाला स्पर्शावते, कधी मैञीचा सप्तरंग उभारते, कधी नात्यांना खुणावते तर कधी-कधी बावरलेल्या आयुष्याला शब्दरचनेतून सावरते. या मनाच्या पारव्याला कल्पनाविलासाच्या आभासी जगाचीही ओळख ही पुस्तकच पटवून देतात तर यापलीकडे जावून समाजातील जाणिवांच्या जखमांनी निरुत्तरही हीच पुस्तकं करतात. हाच तो पुस्तकांचा विस्तीर्ण समुद्र न आटणाऱ्या ज्ञानकोषासारखा या जगाचे रंग, जगण्याचे खरे अंग आणि सत्यपरिस्थितीची जाण दाखवत माणूस म्हणून आपल्यावर संस्कार करत असतात. यावरुन पुस्तकांची परंपरा कशाप्रकारे लाभली आहे याचा अंदाज बांधता येतो. 

सुरुवातीलाच उल्लेखल्याप्रमाणेच आधुनिक काळाच्या, आधुनिक युगात आजही वाचनसंस्कृती येऊन ठेपलेली आहे. बदलत्या वाचनसंस्कृतीकडे बघतांना अनेक गुंतलेले धागेदोरे आपल्या नजरेस टिपतात. विषय अगदी साधा आणि सरळ आहे, पण मी म्हणेल तरीही तो खोल आहे. मी आज खरं तर मला स्वत:ला लिहितं करतेय  पुस्तके, मोबाईल आणि बदलती वाचनसंस्कृती या विषयावर.

 मोबाईल ही आजच्या काळाची नितांत गरज झाली आहे. आपल्या जवळ मोबाईल नसला की, आपण अगदी कावरेबावरे होऊन जातो. म्हणजे बघा ना, आजकाल कुठेही जा लहान लेकरांनाही मोबाईलची एवढी सवय झाली आहे की, त्याच्याशिवाय ते साधा घास देखील घेत नाही. 'एवढुसा जीव' पण मोबाईलचं तञंज्ञान अगदी सहज हाताळतो. मोबाईलच्या उगवत्या काळात ते खुप अप्रुप वाटायचे पण ते आता अगदी सामान्य झाले आहेत. प्रत्येक गोष्टींवर तंञज्ञानाकडे उपाय आहे. सर्वच क्षेञ व्यापणारं हे छोट्या मोबाईल मधील तंञज्ञान, साहित्य क्षेञालाही आपल्या दृष्टिक्षेपात गिळंकृत करण्याचा ठाव घेत आहे. आपल्या साहित्याला नवीन- नवीन युगात नवनवीन माध्यमं खुली झाली आहेत. पुस्तकं आता थेट मोबाईल अॅपच्या माध्यमातून आपल्याला वाचायला मिळतात, प्रसिद्ध होतात. तसेच आपले विचार मांडण्यासाठी आता ब्लॉग, सोशल मिडिया यांचा वापर नवीन पिढीकडून वाढला आहे. आजच्या काळातील तरुण पिढी ही मराठी साहित्य आणि संस्कृती पासून दुर होत आहे असे आपण नेहमीच म्हणतो, पण तिच बाजू काही प्रमाणात जरी या मोबाईल ने भरुन काढली असली, तरी या गोष्टीमुळे लवकरच लिखित साहित्य आणि जुन्या लेखकांचे आणि प्रकाशकांचे वैभव असणारी पुस्तकीय कला आणि त्यांचा व्यवसाय हा काळाच्या पडद्याआड जाणार की काय? अशी जाणीव सतत मनाला सलत असते. 

पुस्तके ही फक्त वाचाण्यापुरती नसतात, तर ती आयुष्याचा एक दृष्टीकोन आपल्याला देतात. उदास चेहऱ्यावर हसूही फुलवतात आणि एकटेपणात मिञताही निभावतात. जर आपल्या एका हातात पुस्तक ठेवले व तद्क्षणी मोबाईल मधील ई-बुक  दिले तर निश्चितच आपला हात हा पुस्तकाच्या छापील प्रतीवरच जाईल. कारण पुस्तकाची छापील प्रत समोर घेऊन वाचण्यात जो आत्मिक आनंद मिळतो, तो मोबाईलवर वाचून कधीच आपल्याला मिळत नाही. हा जवळजवळ प्रत्येकाचाच अनुभव आहे. तद्वतच, बदलत्या वाचनशैलीशी म्हणजेच या मोबाईल वरील पुस्तकांशी जुळवून घेतांना माञ साहित्यक्षेत्र मोठे करणाऱ्या लेखक आणि  एका लेखकाला त्याच्या लेखणीतून जगासमोर ओळख देणाऱ्या प्रकाशकाला आता कोणती वाट पकडावी? हा बुचकळ्यात टाकणारा प्रश्न माञ चिन्हाने चांगलाच ग्रासतो आहे. 

पुस्तक ही लेखकाची बौद्धिक मालमत्ता असते. त्या पुस्तकाला शब्दांकित करतांना तो एका प्रवासातून जात असतो. त्याच्या कष्टाळू रंजक प्रवासाचे चीज होते, जेव्हा लेखक आपल्या लेखणीतून जन्मलेल्या पुस्तकरुपी बाळाचे संगोपन करण्यासाठी तो ते वाचकांच्या हाती सोपवतो तेव्हा. परंतु आता मोबाईल वर पुस्तके अपलोड होत असल्यामुळे पुस्तकाचे सगळे हक्क हे सार्वजनिक असल्यासारखे तर झालेच पण या सर्वातून लेखकांना काय मिळाले? हा प्रश्न माञ मनात वादळ निर्माण करतो. प्रकाशकांचे माञ यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. कित्येक जुनी पुस्तक प्रकाशनं बंद पडली तर काही माञ यातून सुवर्णमध्य काढून थोड्या प्रमाणात चालता आहेत. 

मोबाईलच्या जमान्यात जरी सगळं साहित्य वाचण्यासाठी एका क्लिकवर हजर असलं तरी फुकट मिळाल्यामुळे त्याचे तितकेसे महत्व राहिले नाही. आधी सहज मिळत नव्हते तेव्हा ते वाचण्यासाठी आपली मागची पिढी तरसत असे. अगदी पुस्तकांसाठी उपाशी राहून ग्रंथपालाशी, तिथल्या चपराशी मामांशी मैञी करणे, वाटेल ते काम करुन शेवटी ते पुस्तक हाती यायचं. कधी तरी निराशाच पदरी पडायची. अशा अनेक पुस्तक मिळविण्याच्या या गुजगोष्टी माझ्या सरांच्या तोंडून ऐकतांना अक्षरशः अंगावर काटे येतात. यातून तुम्हाला तर पुस्तकांचं विश्व किती सहज उपलब्ध होत आहे व तुम्ही कशा पध्दतीने त्याचा कुशल वापर करायला हवा हे सांगतांना सरांचा त्यांच्या काळातील तो स्ट्रगल व आमच्यासाठीची तळमळ प्रकर्षाने मनचक्षुंना विस्फारते. खरंच प्रचंड मेहनत घेऊन ते वाचत होते पण इतका अनमोल ठेवा जेव्हा आपल्याला सहज मिळतो आहे तेव्हा आपल्याला त्याची किंमत नाही. मोबाईल आणि पुस्तकाचे नाते जरी जुळले असले तरी ते नाते माञ लेखकांच्या लेखणीला कुठेतरी थांबवत आहे अशी परिस्थिती सध्या दिसते.

साहित्य म्हणजेच आपली खरी संपत्ती आहे.आपले साहित्य एवढे अगाध आणि परिपुर्ण आहे की, त्यात जग बदलण्याची ताकद नक्कीच बळावते. परंतु तेच साहित्य क्षेञ आता मोबाईलच्या जमान्यात टिकाव धरु शकेल का?  बरं आपणच आपल्याला एक प्रश्न विचारू या. आपल्याला वाचनाची खुप आवड आहे आणि आपण ठरवलं की, आपण आज मोबाईलमध्ये छान पुस्तक वाचुया. खरं सांगा, किती जण प्रमाणिकपणे ते पुस्तक वाचतात? वाचायला घेतलं तरी, आपण मध्येच सोशल मिडियावर एक फेरफटका मारून येतो. दोन पानंसुध्दा एकाग्रचित्ताने आपण वाचू शकत नाही. कारण पुस्तक म्हणजेच एकाग्रता आणि ती एकाग्रता मोबाईर स्क्रीनमुळे डोळ्यांवर येणाऱ्या प्रकाशाने भंगुनच जाते. हा एक आरोग्याशी संबंधित प्रश्न आलाच ना?

महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात साहित्य संमेलन पार पडले. दरवर्षीच्या तुलनेत संमेलनामध्ये पुस्तकांचे स्टॉल हे कमी बघावयास मिळतात. म्हणजे बघा साहित्याच्याच संमेलनात असे दृश्य दृष्टीस पडणे म्हणजे पुढे काही वर्षांनी साहित्य संमेलन साहित्य प्रदर्शनाशिवाय कसे पार पडणार यातच शंका वाटते.  कुठेतरी याबाबतीतही विचार होणे गरजेचे आहे. नगण्य झालेली पुस्तक प्रदर्शने व दिवसागणिक कमी होत चाललेली पुस्तक विक्री यामुळे वितरकांचाही मोठा तोटा होत आहे. यावर खरंच विचार करण्याजोगी परिस्थिती आहे. यातून काहीतरी सुवर्णमध्य काढायलाच हवा. खरच ई-बुक, ऑडिओ बुक असे पर्याय हे छापील माध्यमातील पुस्तकांहून अधिक सोयीची आहेत का? काही बाबतीत असतीलही सोयीचे जसे की प्रवासात. पण तरीही मार्केटमध्ये नवीन गोष्टी आल्यावर जुन्या विश्वासू गोष्टींची किंमत कमी नाही ना होत. तसेच पुस्तकांचे आहे बघा. एका सोप्या पण थोड्या मनोरंजक पध्दतीने सांगायेच झाले तर गेम हा मोबाईलमधेच खेळावा आणि पुस्तक हे समोर ठेवून शांत अशा वातावरणातच वाचावे. 

तंञज्ञान नक्कीच पुढे जावे, पण ज्या गोष्टीच मुळात अजरामर आहेत त्यांना न छेडता प्रगती करत रहावी. १०० पैकी ९५% वाचक हे अजूनही पुस्तक खरेदी करुनच वाचायला प्राधान्य देतात. ज्यांना मोबाईल वापरुन आपले पुस्तक प्रकाशित करण्याचे मार्ग माहित असतील त्यांनी ते काळजीपुर्वक करावे आणि वाचकांनीही तंञज्ञानाचा दुरुपयोग करून कुठलेही पुस्तक वाचू नये. कारण त्यामागे त्या लेखकाची मेहनत असते. लेखकाच्या परवानगी शिवाय कुठल्याही पुस्तकाचे  Pdf पुढे पाठवणे, त्यांच्या लिखाणाचा आपल्या नावाने प्रसार करणे कायद्याने गुन्हा आहे. यालाच Copyright Act म्हणतात. योग्य त्या मोबदल्यात खरेदी करुन आँनलाईन पुस्तके वाचावीत ही कळकळीची विनंती. 


तरीही या ऑनलाईन जमान्यातही रमणीय एकांतात पुस्तक वाचण्याची पारंपरिक पध्दत अशीच चालू रहायला हवी. आपल्या पुढच्या पिढीवरही पुस्तकातून संस्कार व्हावेत. जर पुस्तकी ज्ञान संपुष्टात आले तर साहित्य क्षेञाला उतरती कळा लागेल. म्हणुनच जे आपलं आहे ते  आपणच जपलं पाहिजे मग ती एखादी व्यक्ती असो वा तिचं मन असो का आपलं अलौकिक ज्ञानभांडार असणारे आपले साहित्यक्षेञ.....!

बदलत्या वाचनसंस्कृतीकडे बघतांना अनेक अंगांनी आपल्यासमोर साहित्यक्षेञाची भिंत उभी राहते. वाचनसंस्कृतीला फुटलेले नवे आयाम, समीक्षेच्या आरशातून पार झालेले चपखल लिखाण यामुळे लेखनशैलीत पारदर्शकता आली. जुन्या लेखकांची लेखनशैली आणि नवोदित लेखकांची लेखनशैली यात बऱ्याच अंशी फरक जाणवतो. कारण,  कुठल्याही लेखकाच्या साहित्यनिर्मितीवर स्थळ, काळ आणि परिस्थितीचे पडसाद उमटत असतात. मुळात कवी आणि लेखकांच्या सभोवतालच्या अनुभवविश्वातूनच त्यांच्या लेखणीतून शब्द उमटत असतात व पुढे तेच शब्द पुस्तक, कादंबरी, ग्रंथ, कवितासंग्रह यांचे नामरुप धारण करतात. समीक्षा ही लेखकाच्या लेखनकृतीवर संस्कार घडवते हेच खरे. 

म्हणून माझ्या मते, आजच्या बदलत्या वाचनसंस्कृतीचे एक रुपडे म्हणजेच समीक्षा. काळाच्या ओघात पुस्तके प्रत्यक्षात वाचण्यापेक्षा पुस्तके वाचलेली दाखवण्याचा नुसताच बडेजाव मांडला जातो. पुर्वी आजी-आजोबांच्या गोष्टींपासून पुस्तके वाचण्याची आवड निर्माण व्हायची. आता माञ आजी-आजोबांच्या गोष्टींच लोप पावत चालल्या आहे. एकीकडे पुस्तकांच्या गडद विश्वात तल्लीन झालेली पुस्तकप्रेमी तरुणाई नजरेस पडते तर दुसरीकडे पुस्तकांपासून दूर  पुस्तकांच्या विश्वाबाहेर जगणारी तरुणाईही आपल्याला दिसते. अनेक जण म्हणतात, पुस्तकी जगण्यापेक्षा बाहेर प्रत्यक्षात जगून बघा. परंतु बाहेरच्या जगण्याचे विदारक वास्तव म्हणजेच तर पुस्तक, भांबवलेल्या परिस्थितीत जगण्याची जागवलेली नवी उमेद म्हणजेच तर पुस्तक. मुळात पुस्तकांच्या सोबतीत जगणाऱ्या माणसाला आनंदी आयुष्य जगण्याची गुरुकिल्ली सापडते असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. 

शेवटी काय, तर पुस्तके ही निरागस आणि सरळ असतात. त्यांच्यात कितीही गुंतत गेले तरी ते कधीही चुकीचा मार्ग दाखवत नाही व आपण निराशेच्या गर्तेत कधीत चाचपडत नाही. नव्या युगानुसार वाचनसंस्कृतीतही अनेक टप्पे येतील माञ पुस्तकांची परंपरा अडगळीत सापडली, तरी देखील वाचनवेड्यांचा पुस्तकी सत्याग्रह कधीही पुस्तकांचे जग बंदिस्त होऊ देणार नाही ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे.  आज जागतिक पुस्तक दिनानिमित्त "पुस्तक संवर्धन" आणि "वाचन संवर्धन" या दोन नव्या दृष्टीपटलातून बघण्याची गरज आहे. ही दृष्टीपटले आपणही आपल्या डोळ्यात सामावून घेऊयात व वाचसंंस्कृतीच्या रथावर स्वार होऊन अविरतपणे पुस्तकांच्या ज्ञानाने समृध्द होऊयात‌. जागतिक पुस्तक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा देतांना हे दोन विचार मांडते. तुम्हीही विचार करा!


                         🖋️ प्राची नाईक उंडणगावकर 🖋️




Friday, August 12, 2022

म्हणे स्वातंञ्याचा अमृतमहोत्सव

वाचायलाच हवे.......
               म्हणे स्वातंञ्याचा अमृतमहोत्सव
सध्या आपल्या अखंड हिंदुस्थानात स्वतंञ भारताच्या अमृत महोत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच 'हर घर तिरंगाचा' नारा लगावत आहे. लहानांची तर लगबग वेगळीच. उद्यापासून सुरु होणाऱ्या तीन दिवसीय झेंडावंदन सोहळ्यासाठी दररोज प्रभातफेरीतून गावागावांत जनजागृती त्यांच्या शाळेद्वारे करून घेतली जात आहे. 'हर घर तिरंगा, घर घर तिरंगा' ! हा नारा म्हणजे हरीनामच त्यांच्यासाठी.

आज‌ माझ्यासमोर एक असा प्रसंग घडला, ज्याने काही क्षण चक्रावल्यासारंखच झालं. माझी बहिण आणि तिच्या मैञिणी उद्यापासून त्या किती व्यस्त असणार आहेत याबाबत गप्पा मारत बसल्या होत्या. लहानच त्या. त्यामुळे स्वातंञ्यदिनाचा उत्साह त्यांच्यात चांगलाच संचारलेला दिसला. 
थोडा हस्तक्षेप करत मी त्यांना अगदी सहज एक प्रश्न विचारला, कसली एवढी तयारी चालू आहे गं? 
अगं ताई, १५ ऑगस्ट नाही का. 
मग मी म्हटलं हो, पण १५ ऑगस्ट केव्हा आहे? 
काय‌ गं ताई, सोमवारी नाही का १५ ऑगस्ट. 
मला जरा हसूच आले. मग परत एकदा मी‌ म्हंटलं, हो पण बेटा १५ ऑगस्टला काय आहे? 
त्यांचं पुढचं उत्तर जास्त महत्वाचं. 
ताई १५ ऑगस्टला झेंडा वंदन आहे आणि आमची पीटी‌ आहे.
हो पण झेंडा वंदन शाळेत का आहे ? 
कारण १५ ऑगस्ट आहे. 
क्षणभर‌ मी स्तब्ध.... डोळे माञ विस्फारले. ज्या स्वातंञ्याच्या अमृत महोत्सवासाठी जोरदार तयारी सुरू आहे, संपुर्ण राष्ट्रात देशभक्तीचे वातावरण आहे, त्याच देशातील लहान शालेय पिढीला १५ ऑगस्टला भारतीय स्वातंत्र्यदिन असतो हेच माहित नाही. आपण जे राष्ट्रगीत म्हणतो त्याचा नेमका अर्थ माहित नाही. भारत स्वतंत्र कधी स्वतंञ झाला होता? हेच त्यांना माहित‌ नाही. भारतीय स्वातंत्र्यदिनाचा इतिहास त्या चिमुकल्यांसाठी अस्तित्वातच नाही ये. काय म्हणावं अन् काय बोलावं अशी गत झाली आहे.

 कालच माझी मैत्रीण रसिका सदावर्ते हिने एक सुंदर लेख लिहिला, जर मी माझ्या डीपीवर तिरंगा लावला नाही तर मला देशद्रोही समजले जाईल का? माझी देशभक्ती त्या डीपीतूनच मोजली जाईल का? तिरंग्या बाबतीतली सत्यपरिस्थिती तिने मांडली. 'देश का हर बच्चा- बच्चा लहराएंगा तिरंगा' ! पण तो तिरंगा त्यांच्या हातात देण्याआधी त्या तिरंग्याची पार्श्वभूमी, स्वतंञ भारताचा इतिहास त्यांना समजवा. आज भारत स्वतंञ होऊन ७५ वर्षे उलटली. त्या पंच्चाहत्तरीचा प्रवास, आपल्या प्राणाची आहुती देणारे हुतात्मे कोण? यांचा इतिहास आधी जागता करा. तेव्हाच स्वातंञ्याचा अमृतमहोत्सव साजरा होईल. नाहीतर काय; समोर विद्यार्थी देताय घोषणा. भारतीय स्वातंत्र्य दिनाचा विजय असो! हर घर तिरंगा, घर घर तिरंगा! वंदे मातरम्! पण तो नुसता सोपोस्कार असेल. मग रसिकाच्या म्हणण्याप्रमाणे तो तिरंगा झेंडा वंदनानंतर असेल कुठल्यातरी गटारीत किंवा रस्त्याच्या कडेला. मग नाही म्हणायचं, अपमान झाला तिरंग्याचा. कारण आपणच त्यांना तिरंग्याचा इतिहास नाही सांगितला तर त्याची इज्जत करतात हे त्यांना कसं कळणार? ही परिस्थिती आहे सरकारी शाळांची. तेथील विद्यार्थ्यांना कसे शिक्षणाचे धडे मिळत असतील हे या प्रसंगावरून आपण अनुमान लावू शकता. तर मुद्दा हा आहे की, आदरणीय शिक्षक आणि पालक, एकदा तुमच्या मुलांना विचारा. भारतीय स्वातंत्र्य दिन म्हणजे काय? अन् नसेल‌ येत तर त्यांना आधी आपल्या देशाची ओळख करुन द्या अन् मगच स्वातंञ्यदिनासोबत तीन दिवसांचा अमृतमहोत्सव साजरा करा. 

आपल्या भारतीय ज्ञानकोषात एवढं साहित्य आहे, अनेक विचारवंत आहेत, इंटरनेटसारखा गुरु आहे, अनेक चिञपट आहेत आणि त्याहूनही जास्त तुम्ही स्वत: त्या चिमुकल्यांचे गुरु आहात, जे त्यांना हे बाळकडू पाजू शकतात. माञ पाठ्यपुस्तकं शिकवण्याच्या तंद्रीत देशाच्या ऐतिहासिक ग्रंथापासूनच ती मुले अनभिज्ञ आहेत. त्यांना याबाबतीत साक्षर करण्याची पालक आणि शिक्षकांची नैतिक जबाबदारी आहे. तेव्हाच खऱ्या अर्थाने स्वातंञ्याची पंच्चाहत्तरी अमृतमहोत्सवी ठरेल, जेव्हा आजची पिढी तो इतिहासाचा ठेवा समजेल आणि जपेल.
जरा विचार करा अन् पटलं तर‌ जास्तीत लोकांपर्यंत ही पोस्ट पाठवा जेणेकरुन भारतीय स्वातंञ्यदिनापुर्वीतरी या पिढीला स्वतंञ‌ भारताचा थोडातरी इतिहास माहित करुन देण्यासाठी एखादं पाऊल तरी सरसावेल....!
                           🖋️प्राची नाईक उंडणगावकर 🖋️

Thursday, August 11, 2022

🤝कळावे असे बंधन 🤝

कालपासून नुसती डोळ्यापुढे राखी आणि डोक्यात विचार  हेच चक्र माझ्या अवतीभोवती फिरतंय.  पण नेमकं काय माझ्या लेखणीला उतरवायचं आहे हे मलाही उमजेना. कदाचित काहीतरी वेगळंच ती मला खुणावतेय. बालपण? शहाणपण? की असंख्य आठवणींचा संच? माहित नाही काय पण अनेक प्रसंग डोळ्यासमोरून पुसटसे जातांना दिसता तर आहेत, बघूयात येतात का ते मला गाठता.

 राखी पोर्णिमा हा भावा बहिणीच्या रेशमी बंधाचा सण तर कोकणात समुद्र या अन्नदात्याला त्याने केलेल्या उपकारासाठी कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण. चाळायला गेलं तर याच राखीच्या बंधनाचे अनेक रुपं विविधतेतील भारतात आपल्याला आढळतील. पोर्णिमा ही दर महिन्याला येते, माञ राखीला येणारी पोर्णिमा जणू त्या आकाशातील चंद्रालाच राखीच्या बंधनातून बांधायला येते म्हणूनच तो चंद्र त्यादिवशी  दैदिप्यमान प्रकाशमान होऊन आकाशवारी करत असतो. राखी पोर्णिमा, बहिण-भावाचे नाते, राखी पोर्णिमेचे महत्व या सर्व गोष्टी आपल्याला मुखपाठ आहेत. पण खरच आपल्याला राखी कळलीय का हो? तुम्हालाच नाही अगदी मलाही तो इवलासा धागा कधी उलगडलाय का? हा प्रश्न एकदा कधीतरी स्वत:ला विचारावा. का तर...? हा प्रश्न मला पडण्यामागे सभोवताली घडलेल्या प्रसंगाचा हा परिणाम असावा. म्हणून खरतर आजच्याच दिवसाचा मुहूर्त साधून हा लेख....

काल आत्याचा फोन आला अन् ती म्हणते मला आम्हा भावंडांचा एक फोटो हवा आहे तयार करुन देशील का? तेव्हा असं झालं अरेच्छा! एवढ्या वर्षांत अनेक सण समारंभ प्रसंगांना आपण एकञ आलोत पण आपल्या आत्या, काका, बाबा या भावंडांचा एकञ असा एकही फोटो नाही. जरा वाईट वाटलं. पण एक वेगळीच राखीपोर्णिमा डोळ्यासमोर‌ अवतरली. त्यांनी कधी सोबत फोटो काढला नाही, कधीच एकमेंकांवरचं प्रेमही व्यक्त केलं नाही माञ तरी त्यांच्यातील नातं हे आजच्या पिढीपेक्षाही  अतुट वाटतं.  अजूनही पोस्टमास्तर त्यांची राखी पोहोचवतो. त्यातील ते पञ म्हणजे अव्यक्त भावनांनी शब्दांतून मांडलेला सागरच जणू. नकळतपणे बाबा काकांना ती गोष्ट जाणवते. जरी ते व्यक्त होत नसले तरी त्यांनी फोटोत नाही तर‌ मनाच्याच कॅमेरात त्यांची प्रत्येक राखी कैद‌ करुन ठेवली आहे, हे ते पञ वाचल्यावर ध्यानात येते. आता तर व्हॉट्सॲप वर "Happy Rakshabandhan" टाकले की, जवळच्या भावंडांना काय अगदी विदेशातही शुभेच्छा पोहोचतात. माञ त्या पञातून मिळणारा मनाचा विसावा आणि विसाव्यातून निर्माण होणारा ओलावा त्यात‌ जाणवत नाही. 

आजकाल‌ राजकारणातील राखी म्हणजे सगळ्यात मोठी पोर्णिमा. असे साधारण चिञ दिसते. राखीवरुनही राजकारणाची गणितं मांडता येतात ही समज यायला खुप उशीरच लागला. एक नातं असतं ते मानलेल्या बहिण भावाचं. ते‌ ना रक्ताचं असतं ना धर्माचं ना कुठल्याच जातीचं ते असतं फक्त अन् फक्त आपुलकीचं, कर्तव्याचं आणि प्रेमाचं. पुर्वीपासून या अशा नात्याचे संस्कार आपल्याला घरात रुजलेले दिसतात. मी ते प्रत्यक्ष बघते ते म्हणजे माझे बाबा आणि सुलोचना आत्यामध्ये. खरतर अतिशय अप्रुप वाटतं मला. ज्या निस्वार्थ भावनेतून ती आम्हाला जीव लावते त्याच निस्वार्थ भावनेतून बाबाही ते नातं जपतात आणि सर्वात आधी तिची राखी बांधतात.‌ त्या राखीच्या बंधाला नाहीच सर कशाची.

शाळा अन् कॉलेजच्या वातावरणात खुप तफावत असते ती अशी की शाळेत असतांना बालवयातील विचारांची एक वेगळी पकड आपल्यावर‌ असते हळुहळू आपल्या त्याच विचारांना वातावरणाची जोड मिळून प्रगल्भता वाढत जाते‌‌. मला शाळेतली राखी खुप स्पष्ट आठवते. खरतर ते आठवून खुद्कन हसायलाही येते अन् मन लाजिरवाणंही होतं. राखी पोर्णिमा म्हटलं की मुलींमध्ये भारी उत्साह कारण त्यावेळच्या त्यांच्या नजरेतून जी मुलं. त्यांच्यावर लाईन मारत असायचे त्यांना गाठून आधी त्यांना राखी बांधायची अन् ती बांधल्यावर त्या  मुलींच्या चेहऱ्यावरचा आनंद असा ओसंडून वाहत असायचा. खरतर असं‌ काही नसतं पण शेवटी ते बालमनच ना. आजुबाजूच्या प्रसंगांचा उमटलेला तो परिणाम असायचा. पण ती गंम्मतच वेगळी असायची. कारण काही मुलं राखी बांधावी लागेल म्हणून यायची नाहीत तर काही माञ सगळ्यांना चॉकलेट्स किंवा त्याच्याजवळ असतील ते पैसे देवून राखी बांधून घेत असत. खुप मजेशीर बंध होता तो. 

शिक्षणानिमित्त बाहेर राहण्याचा योग आला. शाळेपलीकडचं एक वेगळच विश्व अन् त्या विश्वात सोबतीचा पहिला हात मिळतो तो  मैञीचा. तिथे माञ बंधनं नसतात स्वच्छंदी जगण्याला आणि निखळ मैञीला. मग तो मुलगा असो की मुलगी. मैञी नितळ असते. पण या नात्यात मुलं आणि प्रामुख्याने मुली. कारण मी जवळून त्या गोष्टी बघितल्यात म्हणून मुलींवर  जास्त जोर देवून बोलतेय. आपल्या मिञासोबत बाहेर‌ फिरायला जातात अन् हॉस्टेलच्या आवारात येवून गेटबाहेर‌ तासनतास गप्पा मारत बसतात. यात काहीही गैर नाही हे पुन्हा एकदा स्पष्ट करतेय माञ जेव्हा  वेळ उलटून गेल्यावर गेटवरील वॉचमन काका आवाज देतात. तेव्हा मुलींना विचारले असता त्या उत्तरतात, हा माझा भाऊ आहे. मामाची बाजू मला योग्य वाटली कोणता भाऊ रोज आपल्या बहिणीला सोडायला हॉस्टेलला येतो? कोणती बहिण आपल्या भावाशी कोपऱ्यात जाऊन बोलते किंवा कोणता भाऊ हॉस्टेलची गेट बंद होण्याची वेळ संपल्यावरही आपल्या बहिणीला आत सोडत नाही? हॉस्टेलचे नियम हे मुलींसाठीच असतात ना. पण अशापध्दतीने‌ भाऊ नावाच्या जिव्हाळ्याच्या आणि त्याहूनही जास्त सुरक्षेच्या नात्याला गालबोट लावणं, त्याचा असा वापर करणं एक बहिण म्हणून आपल्याला कितपत योग्य वाटतं‌ हा प्रश्न एकदा स्वत:च्या मनाला विचारुन बघावा. आपल्या आयुष्यात मिञ हे नातंही तेवढंच महत्वाचं असतं‌ ना. मग जेवढं‌ बिनधास्तपणे तुम्ही त्याच्यासोबत‌ असता तसंच जर तुम्ही सांगितलं तर बिघडणार काय आहे. या गोष्टीमुळे खऱ्या भाऊबहिणीच्या नात्यातील आर्द्रता माञ शुष्क होत चालली आहे. आपण कोणासोबत असावे हा व्यक्तीस्वातंञ्याचा विषय असतो.‌ पण जेव्हा तुम्ही एका विशिष्ट ठिकाणी वास्तव्यास असता तेव्हा गेटच्या आतमध्ये तुमची जवाबदारी ही त्यांची असते. तर त्यावेळी आपल्याला मिळालेल्या स्वातंञ्याचा असा दुरुपयोग न करता तिथल्या शिस्तीचे पालन करणे आपले कर्तव्य असते. तर मिळालेल्या संधीचा आणि पवित्र अशा नात्याचा असा वापर‌ कुणी करु नये असे माझे प्रांजळ मत‌ आहे. मिञ आहे तर‌ हो आहे मिञ. त्यात काही गैर‌ वाटण्याचं कारण नाही. आपला दृष्टीकोन पारदर्शक आणि विचारांमध्ये प्रगल्भता असली की, कोण काय विचार करतं हे मुळी ग्राह्य नसावंच. आपण काहीही चुकीचं वागत नाही याचा आत्मविश्वास ठेवून वाट चालावी. 

आणखी एका मुद्यावर प्रकाश टाकावा तो असा की, विद्यापीठासारख्या ठिकाणी पोलीस अनेक तरुण तरुणींना पकडत असतात. तिथेही पोलिसांना पाहून घाबरत हा माझा भाऊ आहे सरळ सांगून मोकळ्या होतात. म्हणजे का? तुम्ही काही चुकीचं‌ वागत नाही आहात तर स्पष्टपणे आपली बाजू मांडतांना जीभ कशी कचरते. ते पोलीस आहेत चौकशी करणं त्याचं काम; पण जर‌ तुम्ही घाबरलेल्या अवस्थेत असाल तर नक्कीच त्यातील‌ काही संधीसाधू पोलीस कर्मचारी तुम्हाला भय दाखवत पैसे उकळण्याचे काम करतील. ही सत्यपरिस्थिती आहे. आपलं जगणं हे जगाच्या मतावर जगणं नसावं तर आपल्याला ज्या गोष्टींमध्ये स्वारस्य मिळेल त्या गोष्टींतूश ते खुलवत जावं.  परत एकदा भाऊ- बहिणीच्या नात्याला लागलेलं हे ग्रहण‌ किती वाईट आहे हे सांगणारे असे अनेक प्रसंग आहेत ज्यात या नात्याच्या नावाखाली आपली कामं केली जातात.  त्यामुळे रक्षाबंधन म्हणजे नेमकं काय तर मिञाची भाऊ म्हणून ओळख करुन देणे. हा आजकालच्या पिढीने लावलेला तर्क.  खुप खिन्न व्हायला होतं या साध्या गोष्टीआणि नातीही किती गुंतागुंतीची झालीये हे बघून. बहिण भावाचं नातं हे कळायला सांगायची गरज नसते. ते समोरच्याला आपोआपच समजचं इतका जिव्हाळा त्यात असतो. हे नातं कॉलेजमध्ये सापडायला तेवढं अवघड असतं पण सापडायला भाग्य लागतं. रक्षाबंधन म्हणजे लहानपणी वेण्या ओढणाऱ्या भावाची तितक्याच प्रेमानं काळजी घेणारी बहिण...
रक्षाबंधन म्हणजे कितीही भांडलो तरी आपल्या बहिणीला काही बोलणाऱ्यावर चिडून जाणारा भाऊ...
रक्षाबंधन म्हणजे एकमेकांच्या सोबतीने वाटून खाल्लेला खाऊ...
रक्षाबंधन म्हणजे बहिण जरी मोठी असली तरी तिच्यापेक्षा मोठं होऊन बापासारखी काळजी घेणारा भाऊ...
कोणी असो वा नसो एक आधार असतो की जरी बालपणाचे हट्ट संपलेले, जरी आता मोठ्यांचे शहाणपण आले, जरी आता बोलणे कमी झाले तरी त्याचा खांदा अजूनही शाबूत आहे माझ्यासाठी, कठीणसमयी तोच येणार‌ धावत मला तारण्यासाठी. 
हेच ते नातं कधी अबोल कधी अव्यक्त , कधी बोलकं तर‌ कधी स्तब्ध पण कधीच होत नसतं ते परकं... संरक्षणाच्या भिंतीचा‌ कायमचा तो पहारेकरी...
माझा भाऊ माझ्या सुखदुःखाचा ‌वाटेकरी.......!
एवढं सहज आणि सरळ हे नातं आहे. या भावा-बहिणीच्या नात्याची ही पोर्णिमा साजरी करतांना आपल्या भावाची जागा आणि भाऊ या नात्याची , शब्दाची जागा मजेतही दुसऱ्यासाठी वापरुन त्याचा अपमान‌ आपण करावा का?
 हा सर्वस्वी आपला प्रश्न आहे........😊😊

                          ‌‌🖋️‌‌‌ प्राची नाईक उंडणगावकर 🖋️
    

Sunday, August 2, 2020

रंग मैत्रीचे...

मिञ... 

कुणी त्याला दोस्त म्हणतं, कुणी यार म्हणतं, तर कुणी 'ए भिडू' असं म्हणत खांद्यावर हात ठेवतो. आपल्या आनंदात आणि दु:खातही आपल़्या पाठीशी खंबारपणे उभा असतो तो मिञच... 
मैञी म्हणजे माणसाने कुटूंबापलिकडे बनविलेलं पहिलं आणि एकमेव नातं. आज ''रंग मैञीचे '' या माझ्या लेखाच्या माध्यमातून मी विशेषकरून  मुलींचे मैञीपलिकडचे नाते आणि मैञीचे रंग उलगडणार आहे. कारण सर्वच असं म्हणतात की,  मुलींची मैञी काय शाळेच्या उंबरठ्यापर्यंत किंवा जास्तीत जास्त कॉलेजच्या गेट पर्यंत,नंतर काय एक तर लग्न होऊन जाते किंवा जबाबदारी मध्ये त्या अडकून जातात म्हणून ती मैञी कुठेतरी मागे पडते. ते थोड्या प्रमाणात खरेही, पण आता काळ बदललाय,  तशी मैञीची परिभाषा देखील बदलत चाललीय  कारण लांब असलो, तरी सोशल मिडियाच्या माध्यमातून आम्ही कनेक्ट असतो. आणि यामुळेच एकमेकींना भेटण्याची धडपड कायम असते. खरच मैञीसारखं सुंदर नातं आणि वेगळेपण या जगात कुठेच नाही आणि हेच मी अनुभवतेय. 
मैञी ना समजवायची असते, ना गाजवायची असते, ती तर रूजवायची असते, मैञीत ना जीव घ्यायचा असतो, ना द्यायचा असतो, इथे जीव लावायचा असतो. ही  एक प्रामाणिक व तरल संकल्पना आहे . जिथं आपलं नातं व्यक्त करायला पुर्ण स्वातंञ्य मिळतं,तिच खरी मैञी..!आपल्या आयुष्यात खुप  मुली असतात, पण प्रत्येकच मुलगी ही आपली मैञीण नाही न होत.  हीच तर खरी गंम्मत  आहे. खऱ्या मैञिणी ओळखणं ही साधी गोष्ट नव्हे, पण एक माञ नक्की ज्यांना मैञीची गोडी चाखायला मिळते न ते खुपच नशीबवान असतात. 
मुलींच्या बाबतीत असं बऱ्याचदा होत असतं की, प्रत्येकच गोष्ट त्या आपल्या जवळच्या व्यक्तीला नाही सांगू शकत, कारण मनात एक भिती असते कि, ते आपल्याला समजून घेतील का?  तेव्हा ती गोष्ट मैञीणींना सांगते कारण तिला माहित असते,मैञी हे एक असं अढळ स्थान आहे जिथे तिला समजून घेतलं जाईल आणि मैञीसुध्दा निस्वार्थ असावी बरं का! कारण मैञीण जर चुकत असेल किंवा चुकीच्या वळणावर असेल तर तिला वेळीच सावध करणं हे खऱ्या मैञिणीचं कर्तव्य आहे. 
मुलींनो मैञी फक्त कॉलेजच्या उंबरठ्यापर्यंत मर्यादित ठेवू नका, तर त्या मैञीच्या सप्तरंगात न्हावुन निघा, तरच तुम्हाला खऱ्या मैञीची ताकद अनुभवायला मिळेल. जेव्हा मैञीण कॉलेजला येत नाही तर आपसूकच तिची कमी भासायला लागते. तिची आठवण येते, खुप काही सुटल्यासारखं वाटतं, कशातच मन लागत नाही हीच मैञीची भावना आहे. मैञी हे एक असं नातं आहे ,ज्याला कुठलही बंधन नाही, वेळ कशीही येवो, ती आपल्यासाठी हजर असते. एकच शब्द बोलते 'मी आहे ना'! तू कशाला काळजी करतेस. या एका ओळीत सर्व काही सामावलेलं असतं. 
मैञीविषयी लिहायला गेलं तर  वेळ ,शब्द ,सर्वकाही कमी पडेन.  "मैञीत एवढे काय विशेष असते ,तर मैञिणी या फक्त मैञीणीच असतात, त्या सख्या, चुलत,मावस अश्या काही नसतात, त्या डायरेक्ट मैञिणी असतात."
इंटरनेटवर बघितलं तर खुप काही लिहायला उपलब्ध असतं पण खऱ्या मैञीचं विश्लेषण करायला लागते ती अनुभवाची सांगड. आणि मी अभिमानाने सांगू शकते, कि मैञीची ती जादू मी अनुभवतेय, ती जगण्याची संधी मला मिळतेय आणि ती जीवापाड मैञी माझ्याकडे आहे. मला जीवाला जीव देणाऱ्या मैञीणी मिळाल्याय. मी खरच जर या माझ्या 'रंग मैञीचे 'या लेखात त्यांचा उल्लेख नाही केला तर तो अपुर्णच राहील, त्याला ते रूपत येणार नाही जे मसा हवे आहे. 
मी मैञीची चव अगदी बालवाडीपासून चाखतेय,आम्ही कधी भांडतो, कधी रागावतो, तर कधी एकमेकींची मजा घेत खळखळून हसतोसुध्दा. जस-जसे वर्षे वाढत गेले तस तशी आमची मैञीही घट्ट होत गेली, त्या शाळेतील प्रत्येक कोपऱ्यात आमच्या मैञीचा सुगंध दरवळतोय. आमचा सात जणींचा ग्रुप.तिथे आम्ही आमची मैञी जन्मभर टिकवून ठेवण्याचा निश्चय केलाय कारण आमचं आसुष्य एकमेकींशिवाय पुर्ण होऊच शकत नाही. आणि शाळेपासुन ते आतापर्यंत ती मैञीची डोर घट्टच होत गेलीय. 
मी नशीबवान आहे, की माझ्या आयुष्याचा सर्वात महत्वाचा भाग माझ्या मैञीणी आहेत, माझ्या प्रत्येक निर्णयात त्या असतात. मुळात आमच्या मैञीची ताकद हा आमच्यातील विश्वास आहे न तशीच एक अजुन मोठी ताकद  ज्यानी  आमची मैञी एवढी घट्ट आहे. कारण ती आमच्या कुटूंबाने समजुन घेतलीय. खरच माझ्या 'सेव्हन स्टार' माझ्या आयुष्यात नसत्या तर मी अशी मुळीच नसते. त्यांनी मला खुप काही शिकवलय, आयुष्य कसं जगावं याचं उत्तम उदाहरण त्या  आहेत.मुख्य म्हणजे कोणीच कोणाला मागे खेचत नाही त्यामुळे प्रत्येकीचा गुण आत्मसात करण्याची संधी आम्हाला मिळाली. धन्यवाद! हा शब्द खुप छोटा आहे. मी रोज देवाला या एका गोष्टीसाठी धन्यवाद करते. आज मैञी दिन त्याबद्दल माझ्या लाडक्या सेव्हन स्टारसाठी मी बोलायलाच हवे...! 
तुम्ही माझ्यासाठी फक्त माझ्या मैञीणीच नाही तर प्रत्येक नात्याचा जिव्हाळा मला तुमच्यातुन मिळतो,प्रेम, आपुलकी, मैञी, भाव, विश्वास आणि या पृथ्वीवरील सर्वच आश्चर्य आणि पंचमहाभुतांचा संगम आहात तुम्ही, माझ्यासाठी आपली मैञी हे नातं म्हणजे माझं कुटूंबच आहे... मी कधीच तुम्हाला त्यापेक्षा वेगळं समजली नाही आणि समजणारही नाही... जीव आहात तुम्ही माझ्या.... मी सतत तुमच्यासाठी हजर असणार आहे, ही गाठ सर्वांनी पक्की बांधुन ठेवा...सेव्हन स्टारचे 7रंग नेहमी उजळच रहाणार.आपल्या मैञीचा इंद्रधनुष्य  सदैव रंगीतच रहाणार..! तर मैञिणींनो,माझ्या चांदण्याऩो...आपला मैञी दिवस तर रोजच असतो पण आज जरा महत्व आहेच तर HAPPIEST FRIENDSHIPDAY MY STARS MY FAMILY.... U GUYS ARE MY BREATH, MY SUNSHINE.. आपल्या सर्वांच्या आयुष्यातील सोनेरी पान म्हणजेच आपली मैञी, 7स्टार या नावालाच माझा सलाम...आता आपल्या आयुष्याला एक नवीनच वळण मिळणार आहे पण मला विश्वास आहे की तिथेही आपली मैञी टिकणार.... 
          पावसाच्या रागात एक सुंदर दिवसाची चाहुल लागली....आनंदाच्या वर्षावाने ही पृथ्वीही सुंदर न्हाली.. प्रेम, मैञीची साक्ष देणारा हा पाऊस स्पर्शुन मला म्हणाला.. नवी नाती, नवी स्वप्न आता एक नवीन पर्व... आयुष्याच्या या पर्वाला कडकडुन मिठी मार... बघ या पावसाच्या वर्षावात मागचाच राग परत येईल.. जुन्या सरींच्या सहवासाने नव्या इंद्रधनुलाही रंग चढतील...
प्रत्येक मुलीला अशी एक तरी हक्काची मैञीण मिळावी जन्मभरासाठी,तिच्यासोबत की एक वेगळ्या धाटणीचं आयुष्य जगू शकेल आणि उद्याच्या जगाचे स्वप्न पाहू शकेल. असेच माझ्यासारखेच तुम्हीही तुमच्या आयुष्यात मैञीचे रंग भरा आणि तिता वेल बहरू द्या. प्रत्येक नातं जपा पण मैञीला जरा जास्त जपा, आयुष्य खुप सुंदर होईल.

बदलत्या वाचनसंस्कृतीकडे पाहतांना

       📚बदलत्या वाचनसंस्कृतीकडे पाहतांना📚 आधुनिक जगाच्या आधुनिक युगात व स्वातंञ्यापुर्वीच्या पारतंञ्यात परिस्थिती बदलाचे वार...